Showing posts with label चैत्रोत्सव. Show all posts
Showing posts with label चैत्रोत्सव. Show all posts

Sunday, April 10, 2016

आदिशक्ती श्री सप्तश्रृंगी देवी



आदिशक्ती श्री सप्तश्रृंगी देवी


महाराष्ट्रात कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी व माहूरगडची रेणुका माता
ही पूर्ण पीठे आहेत. या तिन्ही स्थानांप्रमाणेच श्रेष्ठ असे अर्धपीठ सह्याद्री पर्वतरांगेतील सप्तश्रृंगी हे स्थान होय अशी देवीची महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे आहेत. इंद्राणी, कार्तिकेय, वाराही, वैष्णवी, शिवा, चामुंडा व नरसिंह या सात देवतांचे वास्तव्य डोंगरांच्या सात शिखरांवर आहे. म्हणून या गडास सप्तश्रृंग असे म्हटले जाते. समुद्र सपाटीपासून 4500 फूट उंचीवर हे शक्तीपीठ आहे.
सप्तश्रृंग गडासमोर पूर्वेला मार्कंडेय ऋषींचे देवस्थान मार्कंडेय डोंगरावर आहे. मार्कंडेय ऋषींनी घोर तप केल्यानंतर देवी प्रसन्न झाली व त्यांनी या गडावर देवीची स्थापना केली. सप्तशती ग्रंथानुसार रंभ दैत्याचा पुत्र महिषासूराने खूप धुमाकूळ घातला. त्यामुळे देवांनी होम करून देवीला प्रसन्न करून आपापली शस्त्रे दिली. त्या शस्त्रांचा वापर करून देवीने महिषासूरांचा वध केला. व त्याच ठिकाणी वास्तव्य केले. काहींच्या मते हे श्री जगदंबेचे स्वयंभू स्थान आहे.
सिंहावर आरूढ, अठरा भूजा धारण केलेल्या या त्रिगुणात्मक दर्शन घेऊन पूजन केल्यास भाविकांचे मनोरथ पूर्ण होतात. देवीची मुर्ती अखंड शीळा कोरून तयार केलेली आहे. इ. स. 5व्या किंवा 6व्या शतकात ही मुर्ती कोरली असावी. धारदार नाक, कपाळावर ठसठशीत कुंकू, कर्णफुले, नथ, मुखी फुलविडा, हातात शंख, चक्र, गदा, पद्म, त्रिशुल, कमंडलू इ. 18 शस्त्रे धारण केलेली, मस्तकावर मुकुट  अशी अलंकृत मुर्ती अतिभव्य आहे. मंदिराला खांबांची महिरप, भव्य सभामंडप व डोंगर कपारी, उंच सुळे असलेल्या पाषाणालगत उंचावर असलेल्या मंदिराला लाभलेले निसर्गरम्य वातावरण मनाला आनंद देते.
संत निवृत्तीनाथांनी त्र्यंबकेश्वरी समाधी घेण्यापूर्वी देवीचे दर्शन घेतले होते. नाथ संप्रदायाने सांबरी विद्या याच गडावर प्राप्त केली. छत्रपतू शिवराय, पेशवे बाळाजी विश्वनाथ, समर्थ रामदास, श्रीरामकृष्ण परमहंस आदींनी या देवीची आराधना केल्याचा उल्लेख आढळतो.
परिसरात सरस्वती, लक्ष्मी तांबूल, अंबाल्य, शितला, कालिका, सूर्य, दत्तात्रय अशी 8 पाण्याची कुंडे आहेत. सिद्धेश्वर महादेवाचे हेमाडपंथीय मंदिर, शिवालय हे पुण्यकारक व पवित्र स्नान कुंड आहे. यास गिरिजातीर्थ असेही म्हणतात. शिवतीर्थाजवळ 1200 ते 1500 फूट खोल सतीचा कडा / शितकडा आहे.
देवीच्या चैत्र महिन्यात पौर्णिमेला मोठी यात्रा भरते.. लाखो. भाविक महाराष्ट्र तसेच देशाच्या कानाकोपर्यातून दर्शनासाठी येतात. इच्छापूर्तिसाठी येथे नवस बोलले जातात. तसेच आश्विन महिन्यात नवरात्रोत्सवात 9 दिवस होमहवन, शतचंडी पठण केले जाते. वर्षातून चैत्र महिन्यात व विजयादशमी या 2 दिवशी नवा ध्वज फडकवला जातो. शिखरावर पोहोचण्यासाठी कोणताही मार्ग दिसत नसतानाही ध्वजारोहण हे अवघड, आश्चर्यकारक कार्य परंपरेने पार पाडले जाते.